कन्हान, ता.२२
श्री संताजी अखिल तेली समाज संघटन, कन्हानच्या वतीने भारताच्या २०२६ च्या जनगणनेत ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी तसेच जनगणना फॉर्ममध्ये ‘ओबीसी’ साठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट करण्यात यावा, या मागणीसाठी आज (दि. २२ एप्रिल) नगरपरिषद कन्हान येथे निवेदन सादर करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून हे निवेदन मुख्याधिकारी दिपक घोडके यांच्या मार्फत देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अचूक व वस्तुनिष्ठ आकडेवारी अत्यंत आवश्यक आहे. ओबीसी (इतर मागासवर्गीय) समाज हा देशातील मोठा घटक असूनही आजपर्यंत त्यांची स्वतंत्र जनगणना झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या लोकसंख्येची, सामाजिक-आर्थिक स्थितीची व शासकीय योजनांमधील सहभागाची स्पष्ट माहिती उपलब्ध होत नाही.
सध्या जनगणना फॉर्ममध्ये ‘SC, ST, अन्य’ असा एकत्रित उल्लेख असल्याने ओबीसींची स्वतंत्र ओळख हरवत असून, त्यांच्या हक्कांच्या नियोजनात अडथळे निर्माण होत आहेत. यासाठी २०२६ च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट करून स्वतंत्र जनगणना करावी, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली.
या मागणीमुळे ओबीसी समाजाची अचूक आकडेवारी उपलब्ध होऊन त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय प्रगतीसाठी ठोस धोरणे आखता येतील व सामाजिक न्याय अधिक प्रभावीपणे साध्य होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष सूर्यभान चकोले, महासचिव विदर्भ युवा आघाडी सुनिल सरोदे, सचिव वृषभ बावनकर, सुषमा ताई चोपकर, मीना ताई कळंबे, भगवानजी लांजेवार, अविनाश कांबळे, कमल यादव आदी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्याधिकारी दीपक घोडके यांनी निवेदन पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्याचे आश्वासन दिले।

