कन्हान, ता. १७ फेब्रुवारी येथे उघडकीस आलेल्या अवैध जनावर वाहतूक प्रकरणात पोलिसांच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. प्रारंभी ही धाडसी कारवाई असल्याचे सांगितले जात असले, तरी स्थानिक नागरिकांकडून वेगळीच चर्चा रंगू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चारचाकी वाहनाने वेगात येत एका दुचाकीला धडक दिल्याने हा प्रकार समोर आला. अपघातानंतर वाहनाची तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये गाय व लहान कालवड कोंबून नेत असल्याचे उघड झाले. त्यामुळे ही कारवाई पूर्वनियोजित नसून केवळ योगायोगाने प्रकरण उघडकीस आल्याची चर्चा नागरिकांत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरात अवैध जनावर वाहतुकीचे प्रकार यापूर्वीपासून सुरू असल्याची माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे “ही कारवाई केवळ थातूरमातूर तर नाही ना?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. काहींनी तर अवैध धंद्यांना पोलिसांचा आशीर्वाद असल्याचीही दबक्या आवाजात चर्चा सुरू केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी वाहन जप्त करून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे सांगितले आहे. मात्र या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी होऊन सत्य बाहेर यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अवैध जनावर वाहतुकीच्या वाढत्या प्रकारांवर प्रभावी लगाम लावण्यासाठी केवळ कारवाईची प्रसिद्धी नव्हे, तर ठोस आणि सातत्यपूर्ण उपाययोजना आवश्यक असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

