कन्हान, ता.०६ दिव्यांग बांधवांना शासनाकडून मंजूर झालेला रखडलेला अपंग निधी तात्काळ वितरित करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी आज नगर पंचायत मुख्याधिकारी सचिन गाढवे प्रशासनाला अधिकृत निवेदन सादर करण्यात आले. दिव्यांग नागरिकांना मिळणारा निधी वेळेवर न मिळणे ही गंभीर बाब असून त्यांच्या हक्काच्या निधीचा विलंब अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणीत ढकलत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
दिव्यांग बांधवांना शासनाने मंजूर केलेला निधी वेळेवर न मिळाल्यामुळे त्यांच्या दैनंदिन गरजा भागवणे कठीण झाले आहे. उपचार, औषधे, शिक्षण तसेच जीवनावश्यक खर्च भागवताना अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले.
यावेळी प्रशासनाकडे काही ठोस मागण्या करण्यात आल्या. त्यामध्ये रखडलेला अपंग निधी तात्काळ वितरित करणे, निधी वितरणाची निश्चित तारीख जाहीर करणे तसेच पुढील काळात असा विलंब होऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली.
दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे सांगत, प्रशासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
या वेळी नगरसेवक निकेश मेश्राम, राजू देशमुख, गणेश सरोदे, अभय जांबूतकर, नंदकिशोर मस्के, प्रदीप आकरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

