कन्हान, ता. १७ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती, कन्हान-पिपरी यांच्या वतीने दि. १४ ते २० फेब्रुवारी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक, तारसा रोड येथे विविध सामाजिक, सांस्कृतिक व प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत मंगळवारी सायंकाळी श्री संताजी अखिल तेली समाज संघटना व तेली समाज बांधवांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मानवंदना अर्पण करण्यात आली.
यावेळी नागपूर जिल्हा संपर्कप्रमुख सूर्यभान चकोले व विलास घारपींडे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. समाज बांधवांनी एकामागून एक महाराजांना अभिवादन करत त्यांच्या कार्याला कृतज्ञतापूर्वक स्मरण केले.
कार्यक्रमात भगवान लांजेवार यांनी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित दमदार पोवाडा सादर केला. त्यांना गजानन वडे, रमेश गणोरकर, नत्थुजी चरडे यांनी साथ दिली. त्यांच्या भारदस्त आवाजातील पोवाड्यामुळे परिसरात उत्साहाचे व आत्मीयतेचे वातावरण निर्माण झाले. अनेक नागरिक थांबून हा प्रेरणादायी कार्यक्रम अनुभवत होते.
महिलांनीही महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुनील सरोदे व महिला संघटनेच्या अध्यक्षा सुषमा मस्के यांनी महाराजांच्या विचारांचे पालन करणे हेच खरे सौभाग्य असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलकंठ मस्के यांनी केले, तर आभार उपाध्यक्ष वृषभ बावनकर यांनी मानले.
उपस्थित मान्यवर
अविनाश कांबळे, रमेश गणोरकर, नीलकंठ मस्के, मनोहर कोल्हे, अमित मेघरे, विलास गारपींडे, राजेंद्र शेंद्रे (अध्यक्ष नगर परिषद), संदीप कुकडे, जिवन मुगले, अमोल, विनोद आष्टणकर, संजय चोपकर, शैलेश शेळके, कू. मस्के (पोलीस पाटील कांन्दी), सौ. सुषमा मस्के, सौ. सुनिता वाडीभस्मे, सौ. मीना कळंबे, सौ. विभा पोटभरे, सौ. संजना किरपाने, सौ. ममता आष्टणकर, सुनिता मानकर, संदीप कभे, शुभम बावनकर आदी उपस्थित होते.
जन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विविध सामाजिक संघटनांकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अध्यक्ष सुनील सरोदे यांनी,
“हा उपक्रम पूर्णतः सामाजिक असून कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय सर्व समाजघटकांच्या सहभागातून साकारला जात आहे. महाराजांची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे,” असे सांगितले.
रामटेक तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या कन्हान, तारसा रोड चौक येथे उभारण्यात आलेल्या महाराजांच्या प्रतिमेमुळे परिसरात सकारात्मक, प्रेरणादायी व एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध समाजसंघटना येथे येऊन नतमस्तक होत असल्याने हा उपक्रम सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरत आहे.
शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन समाजात शौर्य, नीतिमत्ता व संस्कारांचे बीजारोपण व्हावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

